लोकल प्रवासाबाबत निर्णय होणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रात्री 8 वाजता जनतेशी संवाद साधणार...
- MahaLive News
- Aug 8, 2021
- 1 min read

मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (8 ऑगस्ट) राज्यातील जनतेशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधणार आहे. आज रात्री 8 वाजता उद्धव ठाकरे यांचं फेसबुक लाईव्ह होईल. गेल्या आठवड्यातच राज्यातील 25 जिल्ह्यांतील कोरोना प्रतिबंधक निर्बंधांमध्ये शिथीलता देण्यात आली होती. पण राज्यात 11 जिल्ह्यांमध्ये कोरोना निर्बंध अद्याप लागू आहेत. शिवाय मुंबईमध्ये लोकल सेवाही सर्वसामान्य नागरिकांसाठी अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. दरम्यान, विरोधी पक्ष आणि काही व्यापारी-नागरिक संघटना या निर्बंधांचा विरोध करतानाही दिसत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर पुढील काही महिन्यांत तिसऱ्या लाटेची शक्यताही तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीचं फेसबुक लाईव्ह 30 मे रोजी केलं होतं. त्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी उद्धव ठाकरे फेसबुकच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. गेल्या काही दिवसांत राज्याला विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागला. या काळात दरड कोसळणं, महापूर यांच्यासारख्या घटनांमुळे राज्यातील अनेक नागरिकांना त्याचा फटका बसला. यादरम्यान, उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्त, आपत्तीग्रस्त भागाचा दौराही केला होता. या परिसरातील नागरिकांना आवश्यक ती सर्व मदत केली जाईल, असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिलं आहे. त्यामुळे आजच्या लाईव्हमध्ये उद्धव ठाकरे याविषयी काय घोषणा करतात, याची उत्सुकताही नागरिकांना आहे.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…
महालाईव्ह न्युज मुंबई
Mahalive News
Comments