लातूर जिल्ह्यात अवकाळी नुकसान; २२ हजार ५६५ बाधित शेतकरी, १० हजार ३६७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान...
- MahaLive News
- Apr 4, 2023
- 2 min read

लातूर- जिल्ह्यात मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीने रबीतील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाकडून पुर्ण करण्यात आले असून, याचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे. जिल्ह्यातील 22 हजार 565 बाधित शेतकर्यांचे 10 हजार 367 हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले आहे. या शेतकर्यांच्या नजरा आता मदत केव्हा मिळणार याकडे लागले आहेत. जिल्ह्यात मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीने रबी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा, करडई पिकांसह द्राक्ष, टरबूज, खरबुज, पपई, आंबे व भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
शासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर महसूल आणि कृषी विभागाकडून नुकसानीचे पंचनामे पुर्ण करण्यात आले आहेत. यात जिल्ह्यातील 22 हजार 565 शेतकर्यांचे 10 हजार 367 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यात जिरायती क्षेत्रावरील 8 हजार 682 हेक्टर, बागायतीचे 1 हजार 78 हेक्टर तर फळपिकांचे 597 हेक्टरवर नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाकडून पंचनाम्याचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
यामुळे आता नुकसानीची मदत केव्हा मिळते याकडे शेतकर्यांच्या नजरा लागल्या आहेत. लातूर तालुक्यात 1 हजार 270, रेणापूर 5279, निलंगा 7647, शिरुर अनंताळ 552, देवणी 5546, उदगीर 355, जळकोट 1819, अहमदपूर 35 व चाकूर तालुक्यात 62 असे एकूण 22 हजार 565 शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक शेतकरी संख्या निलंगा तालुक्यात आहे. जिल्ह्यातील केवळ औसा तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपीटीने नुकसान झालेले नाही. जिल्ह्यात सर्वाधिक निलंगा तालुक्यात 4 हजार 23 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
तर लातूर तालुक्यात 556 हेक्टर, रेणापूर 2211, शिरुर अनंताळ 147, देवणी 2 हजार 465, उदगीर 141, जळकोट 773, अहमदपूर 17 व चाकूर तालुक्यात 31 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, प्रशासनाकडून नुकसानग्रस्त शेतकरी आणि बाधित क्षेत्राचे पंचनामे पुर्ण करुन अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे. अवकाळी पाऊस व गारपीटीने सर्वाधिक 8 हजार 692 हेक्टरवरील जिरायती क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. तर 1 हजार 78 हेक्टरवरील बागायती क्षेत्राला फटका बसला आहे. तसेच 597 हेक्टरवरील फळपिकांची नासाडी अवकाळी पाऊस व गारपीटीने केली आहे.
#लातूर #अवकाळी #MahaliveNews #BreakingNews
Comments