नांदेड जिल्ह्यातील धरणांमध्ये ६१.२३ टक्के पाणीसाठा...
- MahaLive News
- Jul 24, 2021
- 1 min read

नांदेड- गेल्या चार-पाच दिवसांपासून दमदार तसेच काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे नदी-नाले, ओढे भरून वाहत आहेत. जिल्ह्यातील प्रकल्पातही पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. जिल्ह्यातील ११२ प्रकल्पांत पाणीसाठा वाढत असून गुरूवारपर्यंत (ता.२२) ४५६.८६ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ६१.२३ टक्के पाणीसाठा झाला आहे. विष्णुपुरी प्रकल्प देखील पुन्हा भरल्यामुळे शुक्रवारी (ता.२३) तीन दरवाजे उघडण्यात आले आहेत.नांदेड पाटबंधारे मंडळाने साप्ताहिक पाणीपातळी अहवाल दिला आहे. त्यानुसार नांदेड जिल्ह्यात विष्णुपुरी आणि मानार हे दोन मोठे प्रकल्प, नऊ मध्यम, नऊ उच्च पातळी बंधारे, ८८ लघु प्रकल्प आणि चार कोल्हापुरी बंधारे असे एकूण ११२ प्रकल्प आहेत. या प्रकल्पात सध्या एकूण पाणीसाठा ४५६.८६ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ६२.२३ टक्के झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा जास्त असून गेल्या वर्षी याच तारखेपर्यंत ३३७.४७ दलघमी म्हणजेच ४५.२३ टक्के पाणीसाठा झाला होता. गोदावरी नदीवरील डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पात सध्या ७९.२४ दलघमी म्हणजेच ९८.०८ टक्के पाणीसाठा असून तीन दरवाजे उघडून त्यातून एक हजार ६५ क्युसेक्स विसर्ग करण्यात आहे. प्रकल्पातील पाणीसाठा वाढल्यानंतर पुन्हा दरवाजे उघडावे लागणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे पूरनियंत्रण अधिकारी शाखा अभियंता अर्जुन सिंगनवाड यांनी दिली. मानार प्रकल्पात १०५.९५ दलघमी (७६.६६ टक्के) इतका उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. त्यात आणखी वाढ होत आहे. जिल्ह्यातील नऊ मध्यम प्रकल्पात ८४.२६ दलघमी (६०.५९ टक्के) पाणीसाठा तर नऊ उच्च पातळी प्रकल्पात ७७.५३ दलघमी (४०.८५ टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. ८८ लघु प्रकल्पात १०९.८८ दलघमी (५७.५९ टक्के) पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी दमदार पावसामुळे सर्व प्रकल्पात जास्तीचा पाणीसाठा झाला आहे. चार कोल्हापुरी बंधाऱ्याचे दरवाजे सध्या उघडे ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे त्यात पाणीसाठा झाला नाही.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…
महालाईव्ह न्युज नांदेड
Mahalive News
Comments