निवडणुकीचा रणसंग्राम; राज्यातील सात हजारांहून अधिक ग्रामपंचायतींसाठी आज मतदान...
- MahaLive News
- Dec 18, 2022
- 1 min read

मुंबई- राज्यातील 34 जिल्ह्यांमधील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज 18 डिसेंबरला मतदान होत आहे. निवडणुकीचा निकाल 20 डिसेंबरला लागणार आहे. सर्वच प्रकारे उमेदवारांनी मतदारांपर्यंत जाण्यासाठी कस लावला आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावागावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. बंदोबस्तासाठी हजारोंच्या संख्येनं पोलीस कर्मचारी गावागावात तैनात झाले आहेत. संवेदनशील गावांमध्ये अधिकचा फौजफाटा देण्यात आलाय. याचबरोबर अधिकारी आणि कर्मचारी देखील मतदान यंत्रणेमध्ये हजारोंच्या संख्येनं आहेत.
पहा कोणत्या जिल्ह्यांत निवडणूक -
अहमदनगर- 203, अकोला- 266, अमरावती- 257, औरंगाबाद- 219, बीड- 704, भंडारा- 363, बुलडाणा- 279, चंद्रपूर- 59, धुळे- 128, गडचिरोली- 27, गोंदिया- 348, हिंगोली- 62, जळगाव- 140, जालना- 266, कोल्हापूर- 475, लातूर- 351, नागपूर- 237, नंदुरबार- 123, उस्मानाबाद- 166, पालघर- 63, परभणी- 128, पुणे- 221, रायगड- 240, रत्नागिरी- 222, सांगली- 452, सातारा- 319, सिंधुदुर्ग- 325, सोलापूर- 189, ठाणे- 42, वर्धा- 113, वाशीम- 287, यवतमाळ- 100, नांदेड- 181 व नाशिक- 196. एकूण-7,751 एवढ्या ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
विदर्भात एकूण 2,276 ग्रामपंचायतची निवडणूक आहे. विदर्भामध्ये दोन प्रमुख पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नागपूर जिल्ह्यात 236 तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या भंडारा जिल्ह्यात 305 ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. सोबतच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गावामध्येसुद्धा निवडणूक होत आहे. या व्यतिरिक्त विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ज्यात सुनील केदार, यशोमती ठाकूर, बच्चू कडू, मंत्री संजय राठोड यांच्यासारख्या दिगग्ज नेत्यांचा समावेश आहे.
Comments