top of page

'हा तर तीन पक्षांचा नॅनो मोर्चा...' उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'महामोर्चा'वर प्रतिक्रिया...


मुंबई- सत्ताधाऱ्यांकडून वारंवार महापुरूषांचा होणारा अपमान, राज्याबाहेर जाणारे प्रकल्प ... या विषयांवरून आज महाविकास आघाडीकडून महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मोर्चाची खिल्ली उडवली आहे. जे लोक देवी-देवतांना शिव्या देतात, जे संतांना शिव्या देतात, जे वारकरी संप्रदायाला शिव्या देतात, ज्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला,


तो कोणत्या वर्षी झाला, हे माहिती नाही, अशा मंडळींचा आजचा नॅनो मोर्चा होता, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केला. पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरे यांचा पक्ष जसा नॅनो होतो आहे, तसा हा नॅनो मोर्चा होता, कोणत्या तोंडाने हे मोर्चा काढत आहेत. महाराष्ट्रात महापुरुषांचा अपमान कुणीच करू नये आणि कुणी करीत असेल तर ते योग्य नाही.


अशीच स्पष्ट भूमिका आम्ही वारंवार घेतली आहे. त्यामुळे केवळ राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न होतो आहे. मुद्दे संपले की अशा कारणांवर मोर्चे काढले जातात. आज मविआतील हे तीन पक्ष विसरले आहेत की, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद हा काही हे सरकार आल्यावर सुरू झालेला वाद नाही. तो वर्षानुवर्षे सुरू आहे. सीमाप्रश्नाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी जबाबदार आहे.


प्रकाश आंबेडकर यांच्या विधानाशी मी सहमत आहे. कारण, सीमाप्रश्न निर्माण करणारा काँग्रेस पक्ष आहे. छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आमचे आराध्य कालही होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील.

उद्धव ठाकरेंनी मुंबई तोडण्याच्या केलेल्या आरोपाबाबत बोलताना ते म्हणाले की, त्यांची कॅसेट वारंवार तेथेच अडकते आहे आणि ती गेल्या 10 वर्षांपासून तेथेच अडकली आहे. त्यांनी काही नवीन लोक नेमावे आणि त्यांनी त्यांना नवीन मुद्दे द्यावेत, अशी माझी त्यांना विनंती आहे.


मुंबई कुणीही महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही, कारण, भारताचे संविधान हे सर्वोच्च आहे. पण, त्यांना सांगायला दुसरे मुद्देच नाहीत. या मोर्चात तीन पक्ष एकत्र येऊन ‘ड्रोन शॉट’ दाखविता आले नाहीत, तुम्हाला ‘क्लोज शॉट’ दाखवावे लागले. आम्ही त्यांना विनंती केली होती की, आझाद मैदान घ्या. पण, त्यांनी मुद्दाम एका निमुळत्या जागेची मागणी केली आणि तेथे त्यांनी मोर्चा काढला. आझाद मैदानाचा एक कोपराही त्यांना भरता आला नसता, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

3rd Latur International Film Festival 2025
Play Video
bottom of page