लातूरला कोरोना लसीचा तुटवडा; दोन दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा, अन्यथा केंद्र बंद...
- MahaLive News
- Apr 8, 2021
- 1 min read

#लातूर- गेल्या 10 दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत आहे. वाढत्या प्रादुर्भावामुळे का होईना नागरिकांचा लस घेण्याकडे कल वाढला आहे. दिवसाकाठी 6 जणांना लस दिली जात असून आता दोन दिवस पुरेल एवढ्याच लसीचा साठा आरोग्य विभागाकडे आहे. पुरवठा न झाल्यास जिल्ह्यातील काही केंद्र ही बंद करावी लागणार आहेत. 17 जानेवारीपासून लातूर जिल्ह्यात लसीकरणाला सुरुवात झाली होती. याकरिता जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारीही करण्यात आली होती. मात्र, सुरवातीला नागरिकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवली होती. मात्र, सध्या प्रादुर्भाव वाढत असताना लस घेण्याकडे नागरिकांचा कलही वाढला आहे. जिल्ह्यात 1 लाख 82 हजार एवढ्या लसीचा पुरवठा झाला होता. त्यानुसार जिल्ह्यातील 170 केंद्रावर लसीकरण मोहीम सुरू होती. बुधवारपर्यंत जिल्ह्यातील 1 लाख 30 हजार नागरिकांना पहिल्या टप्प्यातील लस देण्यात आली आहे. दिवसाकाठी 6 जणांना लस देण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने समोर ठेवले आहे. सध्या केवळ 20 हजार लस शिल्लक आहेत. त्यामुळे दोन ते तीन दिवस लस पुरेल असा अंदाज जिल्हा शल्यचिकित्सक देशमुख यांनी व्यक्त केला आहे. दोन दिवसात लसीचा पुरवठा झाला नाही तर जिल्ह्यातील काही केंद्र हे बंद ठेवावी लागणार आहेत. लसीच्या पुरवठ्यापैकी 500 लस या वाया गेल्या आहेत. ती निकामी ठरली होती. लसीच्या पुरवठ्याबाबत जिल्हा प्रशासनाने पत्रव्यवहार केला आहे. तर दोन दिवसात लसीचा पुरवठा होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
@महालाईव्ह न्यूज लातूर
Comments